राजस्तानला अतिरिक्त पाणी देण्याची मान यांची घोषणा   

चंडीगढ : राजस्तान सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्तानसाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची घोषणा केली आहे. पंजाब, हरयाना आणि राजस्तानमधील पाणीवादादरम्यान रविवारी मान यांनी ही घोषणा केली. 
 
पंजाब सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजस्तान सरकारने पंजाबच्या कोट्यातून जास्त पाणी मागितले आहे. कारण राजस्तान सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. जेव्हा-जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न येतो, तेव्हा पंजाब कधीही मागे राहत नाही. फक्त पाणीच नाही तर पंजाब राष्ट्रीय हितासाठी आपले रक्तही सांडू शकतो. सैन्यातील जवानांच्या गरजा लक्षात घेऊन राजस्तानला तात्काळ अतिरिक्त पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

हरयानालाही अतिरिक्त पाणी 

हरयाणा सरकारने उष्णतेमुळे ४ हजार ५०० क्युसेक अतिरिक्त पाण्याची मागणी केली होती. मात्र, हरयाना सरकारने आपल्या कोट्याचे पाणी घेतले आहे. त्यामुळे हरयाना सरकराने एक थेंबही अतिरिक्त पाणी देण्यास त्यांना नकार दिला होता. मात्र, केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर काही दिवसांपूर्वी भाखरा नांगल मंडळाची बैठक झाली. पंजाब सरकारच्या अनिच्छेला न जुमानता या बैठकीत हरयानाला ४ हजार ५०० क्युसेक अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
 

Related Articles